भान
आजूबाजूला बघतांना कळतं ; खंबीर बनायचंच असतं , थोडं अवघड असतांनाही सगळं छानंच असतं मृदू , कोमल , हळूवार ; मन जपायला शिकलेलंच असतं , कारण आधीचं गिरमिटलेलं सगळं पुसायचं पण असतं मेहनत , काम , कष्ट ; गरजेला सगळं करायचंच असतं , पण स्वप्न पाहातांना मात्र दिवस न् रात्रीचं गणितंच नसतं धटाशी धट आणि खटाशी खट , जगराहाटीला धरून वागायचं असतं , स्वतःसाठी मात्र स्वतःच ताठ कण्याने उभं रहायचंही असतं चुकलं की सुधरवायचं असतं ; हरलं की पुन्हा नव्याने खेळायचं असतं , कुठेतरी कधीतरी विश्वास ठेवून बघायचंही असतं प्रयत्नात कमी पडायचंच नसतं ; हरवलेलं शोधायचही नसतं , पण पुन्हापुन्हा गमावेल असं काही करायचंही नसतं विचार करून , मनाशी बोलून शहाण्यासारखं वागायचं असतं ; पण तरीही प्रत्येकक्षण जगणं सोडायचंही नसतं मनापासून जगण्याचं भान कधी सोडायचंच नसतं…. - श्रुतकिर्ती २७/१०/२०२३