ही कहाणी आहे एका थोरलीची आणि दोन धाकट्यांची. (वयाने मोठ्या छोट्या म्हणून थोरल्या धाकट्या बरंका!)
थोरली मुलांच्या, स्वतःच्या वेळा जुळवता याव्यात म्हणून नोकरी बदलते आणि तिथे तिला भेटते धाकटी. ती तिच्यासारखीच, शिक्षण वेगळे घेऊनही वेगळीच नोकरी करणारी. शांत, जरा अबोलच, नाजुकशी! हि मात्र अगदी उलट, सदैव गप्पाटप्पा, धांगडधिंगा. पण कसे कोण जाणे सूत जुळले. थोरलीला धाकटीच्या शांत स्वभावामागचा उत्साहाचा झरा सापडला तर धाकटीला बडबडीपलीकडची शांतता. थोरली धाकटीला सांभाळून घेते या पब्लिक फेस मागे अगदीच उलट चित्र प्रत्यक्षात असे. धाकटीच्या गंभीर पण ठाम स्वभावाचा निर्णयात मोठा role असे. वर्षामागून वर्षे गेली आता एकमेकांशिवाय आयुष्य शक्यच न्हवते आणि थोरलीने गाव बदलले. धाकटीचे कसे होणार हि चिंता आजूबाजूच्या साळकाया माळकायांना पडली. पण मुळातली खंबीर धाकटी अधिकच खंबीर झाली आणि थोरलीशिवायच्या रूटीनला लागली. मोठी मात्र दुसऱ्या मातीत रुजली नाही. धाकटीशिवाय रोजचे आयुष्य एन्जॉय करू शकली नाही. आणि एक दिवस एक गम्मत झाली तिला एक नवी धाकटी मिळाली खूप वेगळी अगदी उलट स्वभावाची, बावचाळलेल्या confuse थोरलीचा आधार कधी बनली ते तिला कळलेच नाही. स्ट्रॉंग, ठाम, ऍक्टिव्ह स्वतःच्या निर्णयाला टिकून राहणारी. नवी धाकटी थोरलीत छोटे छोटे कां होईना बदल घडवून आणू लागली. मनांच्या तारा जुळल्या आणि मैत्र जुळून आले. आणि घात झाला धाकटीने शहर, राज्य पार देशच बदलला!
पुन्हा आजूबाजूच्या गावगप्पांना ऊत आला थोरलीचा आधार गेला पण कसे कोण जाणे रोपट्याने मुळे घट्ट रोवली होती थोरली ठाम राहिली आणि सगळ्या आठवणी डोळ्यांत न दिसू देता खंबीरपणे पुढे जात राहिली!
जशा थोरलीला धाकट्या मिळाल्या तशा आपल्यालाही मिळो.
अशी
हि आटपाट नगरातल्या थोरलीच्या थोरलेपणातून धाकुटे होत पुन्हा थोरले होण्याची साठा
उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण!
Comments
Post a Comment