ख्वाबिदा
ख्वाबिदा - माझ्या
मनात डोक्यात केव्हाही, कधीही येणारे विचार, त्या क्षणी जरी मला ते रँडम वाटले तरी मलाही माहितेय
त्यांचा कुठे तरी माझ्या भूत, वर्तमान
यांच्याशी संबंध असतोच. कोणताच विचार हा आभाळातून पडल्यासारखा किंवा कुत्र्याच्या
छत्रीसारखा उगवत नक्कीच नाही. मग कां येतात ते मनात? मांडावेसे ,सांगावेसे
वाटतात म्हणजे तरी काय? कोणीही लिहते, बोलते म्हणजे तरी नक्की काय करते? प्रत्येक विचारातली, लिखाणातली पात्रे,प्रसंग काल्पनिक म्हणजे तरी काय? १००% कल्पना असे काही असते कां?
पण १००% सत्य हे तरी असते
कां?आपले विचार सत्य आणि
कल्पना या तळ्यात मळ्यात सदैव वावरत असतात. एखाद्या क्षणी हि रेषा धूसर होते आणि
मग उमटतो तो आपल्या मनाचा प्रवास. सत्य,असत्य, कल्पना, वास्तव या पलीकडचा. रिपोर्ताज लिहणारे वास्तव
मांडतात. पण ते तरी वास्तव कुठे असते? ते त्यांच्या मनाला पटलेले विचारांनी दाखविलेले वास्तव असूच शकते. माणसे वेगळी
मने वेगळी वास्तव वेगळे.
सत्य आणि कल्पना या
दोघांच्या मिश्रणातून आपल्याच मनात आपले एक जग असते. ते प्रत्येक व्यक्तीकडे
घटनेकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघत राहते, मते तयार करत राहते. कधी ती मते व्यक्त होतात कधी जगासमोर
मांडायला नको म्हणून मनात दडविली जातात. बऱ्याचदा एखादा माणूस एकदा भेटूनही जवळचा
वाटतो पण एखादी रोजची व्यक्ती, जागा अनोळखी राहते ती या मनातल्या मनात चालू असलेल्या
विचारांनीच. Sixth sense, intuition
अशी चिकार नावे दिली तरी हे
मूर्त अमूर्त विचारच असतात. कधी प्रकट होतात तर कधी पुढच्या विचाराखाली दाबून
जातात.
या रँडम विचारांचे आपलेच
एक विश्व असते,आपला त्यांच्यावर
नाहीतर त्यांचा आपल्यावर कंट्रोल असतो. त्यांच्या मर्जीने ते येतात नाहीतर
शोधूनही सापडत नाहीत. असतात अगदी रोजचेच, रोजच्या जगण्यातले पण कधीकधी त्यामागे दडलेले गूढ तेव्हाच काय नंतरही उलगडत
नाही. मग या विचारांचे करायचे तरी काय? त्यांची गर्दी झाली कि घुसमटही होतेच. मग मनात येते हे लिहावेत. Revisit
करावेत. त्यांचे गूढ सोडवावे. पण लिहावेत तरी
कां? कुणी वाचावेत तरी कां?
ज्याचे त्याचे वास्तव त्याने स्वतःच धुंडाळावे
आपले गूढ आपणच सोडवावे. लिहणारा मार्गदर्शक कां बनू पाहतो तो स्वतःच तर प्रवासी
असतो.सत्य आणि कल्पनेच्या तारेवर balance करणारा.
सहप्रवाश्याचा शोध असतो
कां तो? कसा मिळणार सहप्रवासी.
तारेचा thickness तो किती कमी,मावणार कसा दुसरा? Balance साधणार कसा?
पण तरीही विचार मांडत
राहायची गरज असते. सहप्रवासी शोधायची आस असते. कल्पनेला धुमारे फुटू द्यायचे असतात,
सत्य झाकोळयाचे नसते. कारण,
कारण, विचार करणे,मांडणे हे
जिवंतपणाचे लक्षण आहे आणि आपल्यातले स्वप्नाळुमन; आपल्यातली ख्वाबिदा जिवंत ठेवायची असते.
एक मी सारे बघणारा
दिसतो जिथे तिथे कधीच नसणारा
माझ्यात सारे, साऱ्यात माझे पाहणारा!
-संदीप खरे (मौनांची भाषांतरे)
-श्रुतकिर्ती
-२६/०२/२०२१
वाह! माझी ख्वाबिदा 😃👌.
ReplyDeleteArbitrary thoughts चा randomness छान सूत्रबद्ध केलास. हे तू समर्थपणे शब्दरूपात मांडू शकलीस, म्हणून तू ख्वाबिदा.
Arbitrary विचार सर्वांना येत असावेत, पण ते भाषेच्या सामर्थ्याने, शब्दांच्या प्रभावीपणे जनमानसांच्या जाणीवांशी जोडता येण्याची कला जी तुला निसर्गाने दिली आहे, त्याला justice देण्यासाठी लिहिणं हा तुझा धर्मच असावा. Thanks a Zillion for starting this blog. ❤️💜😍 ~ CK
Thank you CK for having belief in my random thoughts and my way of expressing them.
Delete