सारं कसं छान छान


दिवस संपला, आठवडाही संपायला आला

मग कोणालातरी उगाचच प्रश्न पडला,

कसं काय? दिवस पार पडला?

पटकन म्हटले छान छान

दिले उत्तर, थांबला संवाद.

जातोच ना रोजचा दिवस छान?

प्रश्न पडायलाच हवा का उत्तर देतांना?

अशी काय मणामणाची ओझी उचलली दमायला?

का गुंतागुंत सोडवली डोक्याला छळायला?

क्षणभराचा प्रश्न मग उत्तरही क्षणाचेच

छान छान म्हटल्यावर कोडेच सुटते ना सगळ्यांचे.

पण,

कधीतरी हुकतोच तो एक पळ

मधेच थांबवतो मग उत्तरही सोपे सरळ.

उगीचच डोके जाते खाजवले

आणि सापडते उत्तर नवे नवलाईचे.

काहीतरी टोचलेले, काहीतरी बोचलेलें

मिळाली उसंत म्हणून उगाचच सललेले,

रिकामपणाचा उद्योग, दुखलेले सुख

आठवते हळूच आणि

मोठे होत जाते उत्तर खूप.

मोठे उत्तर मग वाढवते प्रश्न

सरळ वाटेला मग येते अवघड वळण.

असली वळणे त्रासदायक फार

खडखड, धडपड, रस्ताच चुकार

धडपडले कि येते डोके जाग्यावर

दिसायला लागते सगळे क्लिअर.

तो उसंत घेतलेला क्षणाचं घालतो घोळ

पळभराचा विचार फसवतोच कि सरळ.

पटकन म्हटले छान छान

 विषयच मिटला,

नकोच तो रस्ता सगळा प्रश्नच सुटला.

 

-श्रुतकिर्ती

-१३/०१/२०२३



 

 

Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान