प्रश्नोत्तरे
प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच,
पण प्रश्न असावाच लागतो कां?
विशेषतः, उत्तर माहीत असणारा प्रश्न विचारावाच वाटतो तरी कां?
उत्तरे सरळ सोपी असतात
म्हणून प्रश्न अवघड करायचे असतात कां?
सरळ उत्तर देणार्याला पेचात टाकायला,
वाकडे प्रश्न तयार करायचेच असतात कां?
उत्तर फार सोपे… एका पुर्णविरामात संपणारे
त्याला, पण परंतू किंवा करायला लावायला,
प्रश्न टाकायचेच कां?
उत्तराकडून अपेक्षांच जास्त
म्हणून मग प्रश्नही वाढवायचेच कां?
सरळ सोपे उत्तर कां? कुणी? कसे? कुठे
मध्ये अडकवायचेच असते कां?
आता दे उत्तर,
ये मैदानात,
चल रिंगणात ही प्रलोभने दाखवायला
प्रश्नांचीच मदत होते
म्हणून मग सरळ सरळ प्रश्नोत्तरांच्या कुस्तीत
आपला पैलवान उतरवायचाच कां?
हेतू चांगला असेल तर
प्रश्नाशिवायही उत्तर मिळते
पण मीच एक शहाणा सांगायला
प्रश्नांचे जाळे विणायला लागते
प्रश्न विरूध्द उत्तर
उत्तरावर मात करणारा प्रश्न
खेळ रंगावावाच लागतो कां?
तिकीट न विकताच
प्रश्नांचा खेळ पटावर लावावा वाटतोच कां?
शेवट काय?
प्रश्न विचारणारा शहाणा? हुशार? चांगला?
उत्तर न देणारा… चिखलात न उतरणारा वेडा? घाबरट? बावळट?
या वादात पडायला पुन्हा प्रश्नच विचारायचा कां?
पुरे करा प्रश्नोत्तरे
एकदातरी बोला साधेपणाने
एकाही प्रश्नाशिवाय
रंगूद्या की गप्पांगणे
श्रुतकिर्ती
१/०७/२०२३
हेतू चांगला असेल तर
ReplyDeleteप्रश्नाशिवायही उत्तर मिळते
पण मीच एक शहाणा सांगायला
प्रश्नांचे जाळे विणायला लागते
~ श्रुती, हे कडवं खूप आवडलं. स्वानुभवाचे आणि १००% पडताळून पाहिलेले आहे. ♥️ ~ कल्याणी
Thank you Kalyani, तुझ्या भावना मनापासून व्यक्त केल्याबद्दल
Delete